रस्त्याने प्रवास परत सुरु करुन आता वर्ष दीड वर्ष तरी झालं. आधी कॉलेज मध्ये असताना सतत सायकल नेच सगळी कडे फिरायचे…मी माझी सायकल आणि रस्ता…. नोकरी करायला लागल्यानंतर मात्र रस्ता आणि सायकल दोन्ही सुटलं ते आत्ता आत्ता पर्यंत.
इथे महापे ला यायचं तर सगळ्यात जवळ आणि सोयीस्कर प्रवास म्हणजे रस्त्यानेच. आधी स्कूटर आणि आता ऑटो. पण विरारचा निवांतपणा काही या रस्त्याला नाही. हिरवळ ही अगदी तुरळकच.
पण वर्दळ खूप आणि ट्रॅफिक जॅम तर डोंबिवलीकरांच्या पाचवीलाच पूजलेला. ज्या दिवशी ट्रॅफिक नसतं तेव्हा आम्हालाच फार चुकल्या चुकल्या सारखं होत…
तर रस्त्याने प्रवास सुरु होऊन, पडून बिडून, हाड मोडून घेऊन झालं. ज्या ऑटो ला शिव्या घातल्या त्यातूनच जायचं नशिबात आलं आणि आजवर जाणवलं नाही अस काही तरी लख्ख उमजलं.
चालणारी वाहने, माणसे, आसपासची दुकाने, घरे, आजूबाजूला असणारी झाडे इतकच कशाला अगदी बाजूला उभ्या असलेल्या होर्डिंग्ज सहित संपूर्ण रस्त्याला एक आत्मा आहे. एक collective soul. त्या आत्म्याला स्वतःची अशी एक अविरत गती आहे आणि त्याच वेळी तो तेवढाच स्थिर ही आहे.
इथे प्रत्येकाचाच एक स्वतंत्र प्रवास चालू आहे. गर्दीत गर्दीच्या बरोबरीने आणि तरीही एकट्याचा असा. माणसांचाच न्हवे केवळ तर वाहनांचा सुद्धा. प्रत्येक गाडी आपल्या मालकाच प्रतिबिंब. त्याच्या परिस्थितीच… मनःस्थितीचं… प्रत्येकाची एक वेगळी कथा…
आणि या अश्या सगळ्या विविधतेची मोळी बांधून चालणारा.. काही नवीन सांगू पाहणारा.. जख्ख म्हाताऱ्या वयात जमा झालेली अनुभवांची झोळीच जणू उपडी करावी तसा अनेक गोष्टी सांगणारा… अनेकांच्या आनंदाचा आणि वेदनेचाही मूक साक्षीदार… असा रस्ता आपल्याला काही तरी सांगतो आहे… लक्ष देऊन ऐका…

No comments:
Post a Comment